आनंदी बाजारामुळे विद्यार्थ्यांना मिळाले व्यवहारी ज्ञान अल्पेश ढवळे
आनंदी बाजारामुळे विद्यार्थ्यांना मिळाले व्यवहारी ज्ञान अल्पेश ढवळे

आनंदी बाजारामुळे विद्यार्थ्यांना मिळाले व्यवहारी ज्ञान
अल्पेश ढवळे निघोज / प्रतिनिधी दिनांक 17 मार्च पत्रकार (योगेश खाडे)
निघोज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित ‘आनंदी बाजार’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचे ज्ञान मिळत असून शिक्षणासोबतच जीवनकौशल्यांचा विकास घडविणारे हे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे मत युपीएससी परीक्षेत देशात ६८७ वा क्रमांक मिळवणारे अल्पेश अरुणा भाऊसाहेब ढवळे यांनी व्यक्त केले.
मंगळवार दि. १७ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत शाळेच्या आवारात ‘आनंदी बाजार’ाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन ढवळे यांच्या हस्ते झाले. यावेळी पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे अध्यक्षस्थानी होते.
ढवळे म्हणाले, “जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हीच आपली मातृ-पितृ संस्था आहे. या शाळेमुळेच आपला शैक्षणिक पाया भक्कम झाला. गेल्या वीस वर्षांत शिक्षणपद्धतीत मोठे बदल झाले असले तरी जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सातत्याने उंचावत आहे. येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक संस्कृती रुजवून उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी केली आहे.”
कार्यक्रमात केंद्रप्रमुख बाचकर सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कैलास शिंदे, मुख्याध्यापक गणपतराव देठे, ज्येष्ठ शिक्षक शिंदे सर, ज्येष्ठ शिक्षिका लंके मॅडम, शिक्षिका लाळगे मॅडम, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, माजी सरपंच शिवाशेठ पवार, पत्रकार संघाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पसायदान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र महाराज सुपेकर यांनी सांगितले की, “अल्पेश ढवळे यांनी मिळवलेले यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. जिल्हा परिषद शाळांमधूनही मोठ्या पदांपर्यंत पोहोचता येते, याचे ते जिवंत उदाहरण आहेत. येथील शाळांमध्ये मराठीसह इंग्रजी शिक्षणाचीही चांगली सोय उपलब्ध होत असून शैक्षणिक दर्जा सातत्याने उंचावत आहे.”
यावेळी बाचकर सर, मुख्याध्यापक देठे सर, उनवणे आदींचीही मनोगते झाली.
चौकट : ‘आनंदी बाजार’ला उस्फूर्त प्रतिसाद
मंगळवार हा निघोजचा साप्ताहिक बाजाराचा दिवस असल्याने शाळेच्या आवारात भरलेल्या ‘आनंदी बाजार’ला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मिठाई, खेळणी, भाजीपाला, फळे आदी वस्तूंनी बाजार गजबजून गेला होता. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत चार तासांत सुमारे ५० हजार रुपयांची उलाढाल केली.
प्रभाग क्रमांक ४ मधील महिलांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे शाळेतील शिक्षकांनीही तब्बल सहा हजार रुपयांची खरेदी करून विद्यार्थ्यांना व्यवसायाचे धडे दिले. पत्रकार संघाच्या सदस्यांनी सोशल मीडियावर केलेल्या प्रसिद्धीमुळे शेकडो ग्रामस्थांनी बाजाराला भेट दिली.
परिसरातील अनेक शाळांनी ‘आनंदी बाजार’चे आयोजन केले असले, तरी दि. १७ रोजी निघोज येथे भरलेल्या बाजाराला सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.




