जिल्हा परिषद शाळेची ‘एन.एस.ई.’ स्कॉलरशिपमध्ये राज्यभर झेप; निघोजच्या विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी
जिल्हा परिषद शाळेची ‘एन.एस.ई.’ स्कॉलरशिपमध्ये राज्यभर झेप; निघोजच्या विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी

जिल्हा परिषद शाळेची ‘एन.एस.ई.’ स्कॉलरशिपमध्ये राज्यभर झेप; निघोजच्या विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी
निघोज – दिनांक 24 मार्च
निघोज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘एन.एस.ई.’ स्कॉलरशिप परीक्षेत राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. ग्रामीण भागातील शाळांमधूनही गुणवत्तेच्या जोरावर मोठी भरारी घेता येते, याचा प्रत्यय या यशातून पुन्हा एकदा आला आहे.
या परीक्षेत वेदिका किरण बोटकर हिने 200 पैकी 180 गुण मिळवत राज्यात नववा क्रमांक पटकावला. अर्णवी राहुल पांढरकर हिने 174 गुणांसह राज्यात बारावा क्रमांक मिळवला, तर काव्या अभिमन्यू पवार हिने 172 गुणांसह राज्यात तेरावा क्रमांक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला. या तिन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे निघोज परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या यशामागे मुख्याध्यापक गणपतराव देठे सर, ज्येष्ठ शिक्षक शिंदे सर, ज्येष्ठ शिक्षिका लंके मॅडम तसेच शिक्षिका लाळगे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देत सातत्याने घेतलेले परिश्रम आणि शैक्षणिक बांधिलकी यामुळेच हे यश शक्य झाले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, संदीप पाटील, वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, स्कूल कमिटीचे अध्यक्ष रोहन उनवणे तसेच पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. लवकरच पत्रकार संघाच्या वतीने या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
दरम्यान, निघोज परिसरातील कुंडवस्ती, तनपुरे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्येही विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळत असून या शाळांमधील विद्यार्थीदेखील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्तरावर यश मिळवत आहेत. तीनही शाळांमध्ये गुणवत्तेची स्पर्धा निर्माण झाली असून या शाळांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाही मागे टाकल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी स्कॉलरशिपसह विविध परीक्षांमध्ये सातत्याने उल्लेखनीय यश मिळवत आहेत. परिणामी या शाळांकडे पालकांचा कल वाढताना दिसत आहे. सध्या शेतीमालाला मिळणारा कमी भाव आणि वाढती महागाई यामुळे अनेक पालक इंग्रजी शाळांऐवजी मोफत व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद शाळांकडे वळत असल्याचे चित्र ग्रामीण भागात स्पष्टपणे दिसत आहे.
एकूणच, निघोजच्या जिल्हा परिषद शाळांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करत ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचा झेंडा राज्यभर फडकावला आहे.




