
Updated by – स्टार वन न्युज मराठी ™
Star one news Marathi ™⭐
9 नोव्हेंबर 2025
महाराष्ट्र ·
Nirmala Sitharaman on local language: महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही, असे अरेरावीने सांगण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. विशेषत: सरकारी कार्यालयांमध्ये असे प्रकार घडले तर संतापजनक असते. महाराष्ट्रातील बॅंकांमध्ये आता कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी मराठीतच बोलावे लागणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी स्थानिक भाषांमध्ये बोलण्यासंदर्भात स्पष्ट शब्दात निर्देश दिले आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.

#star one news Marathi ⭐
✍️’ग्राहकांशी मजबूत संबंध बनवा’
🔴सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ग्राहकांशी अधिक घनिष्ठ नाते निर्माण करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. बँकांच्या शाखांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या भागातील प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असावे, असे त्यांनी सांगितले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका कार्यक्रमात बोलतानात्यांनी हे निर्देश दिले. त्यांच्या मते सिनिअर मॅनेजमेंटला स्थानिक भाषा येत नसली तरी ब्रॅंच मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी ग्राहकांच्या बोलीभाषेत संवाद साधावा. तसेच भाषिक कौशल्यावर आधारित कामगिरी मूल्यमापनाची शिफारस करण्याचीही त्यांनी तयारी दाखवली.
✍️भरती प्रक्रियेत सुधारणांची गरज
बँकिंग क्षेत्रातील नियुक्ती आणि मनुष्यबळ धोरणांमध्ये बदल आवश्यक आहेत. स्थानिक बोली बोलणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देऊन त्यांची निवड केली जावी आणि त्यांना योग्य मान्यता मिळावी, असे त्यांनी सांगितले. विविध प्रदेशांत प्रादेशिक भाषा बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता ही गंभीर समस्या असून, त्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नसल्याचेही त्या म्हणआल्या. यामुळे बँकांना ग्राहकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील आणि सेवा अधिक प्रभावी होईल, असे त्या म्हणाल्या.
✍️ग्राहकांशी वैयक्तिक संबंध कमी झाल्याचे परिणाम
ग्राहकांशी वैयक्तिक संबंध कमी झाल्याने बँकांना कर्ज मूल्यांकनासाठी क्रेडिट माहिती संस्थांवर अवलंबून राहावे लागत आहे. या संस्था आकडेवारी अपडेट करण्यात वेळ घेतात, ज्यामुळे अनेक पात्र व्यक्तींना कर्ज मिळत नसल्याची स्थिती निर्मला सितारमण यांनी बोलून दाखवली. पूर्वी बँक अधिकारी स्थानिक ग्राहकांना वैयक्तिकरित्या ओळखत असत आणि त्यांच्या विश्वासार्हतेची खात्री करत असत. आता ही पद्धत लोप पावली आहे, ज्यामुळे बँकिंग प्रक्रिया अवघड झाल्याचे निर्मला सितारमण म्हणाल्या.
✍️’बॅंक कर्मचाऱ्यांनी आधुनिक डिजिटल साधनांसोबत वैयक्तिक संपर्क जोडणे अनिवार्य आहे
बॅंक कर्मचाऱ्यांनी आधुनिक डिजिटल साधनांसोबत वैयक्तिक संपर्क जोडणे अनिवार्य आहे. राष्ट्रीयकरणापूर्वीच्या खासगी बँकांनी स्थानिक ग्राहकांसोबत मजबूत बंध निर्माण करून यश मिळवले होते. आजही हे तत्त्व लागू करून बँकांना व्यवसाय वाढवता येईल. तसेच स्थानिक भाषा आणि समजूतदारपणामुळे ग्राहकांची निष्ठा वाढेल आणि बँकांची प्रतिमा उजळेल, असा विश्वासही निर्मला सितारमण यानी व्यक्त केला.
✍️ ‘देशातील सर्वाधिक आश्वासक संस्था बना’
अजूनही अनेक लोक बँकांऐवजी व्याजखोरांकडून कर्ज घेतात, याबद्दल अर्थमंत्री सितारमण यांनी चिंता व्यक्त केली. अलीकडील दोन प्रकरणांचा दाखला देत त्यांनी बँकांना ग्राहकांप्रती अधिक सहानुभूतीपूर्ण असावे, असे सांगितले. कर्जदारांना वारंवार पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्याची सक्ती न करता, छोट्या मुद्द्यांवर सुधारणा केल्यास बँका देशातील सर्वाधिक आश्वासक संस्था बनू शकतात, असे त्या म्हणाल्या.




